वीस वर्षं .. वीस समारोपाचे दिवस .. पण वातावरण तितकंच (किंवा कांकणभर जास्त) भावनिक झालेलं … आणि मग ९.३० च्या सुमारास डोळ्यातले अश्रू पुसत, किंवा मस्त दिलखुलास हसत घेतलेल्या निरोपांचे तेच भारलेले क्षण ! काल म्हणजे ५ जून २०११ ला सुदर्शन रंगमंचावर पूर्ण भरलेल्या सभागृहासमोर पीडीएच्या नव्या प्रशिक्षणार्थींचे चार नाट्यप्रवेश सादर झाले. या प्रवेशांमधे भाग घेतलेले जवळजवळ सर्वचजण रंगमंचावर प्रथमच पाऊल ठेवत होते. काहींनी फार वर्षांपूर्वी बालनाट्यात घेतलेल्या सहभागानंतर थेट आज पुन्हा रंगमंचावरचा प्रकाश अंगावर झेलला होता .. आणि ह्या नाट्यप्रवेशांची आणखी एक गंमत अशी होती की हे प्रवेश या नव्या कलाकारांना हाताशी घेऊन त्यांच्या दिग्दर्शकांनी केवळ पाच दिवसात बसवले होते. ज्यांनी ती पाहिले त्यांनी भरभरून शाबासकी दिली. पण ज्यांनी ते पाहिले नाही त्यांच्यासाठी इथे काही क्षणचित्रंही देत आहोत.
हे नाट्यप्रवेश गेल्या चार वर्षांपासून थेट नाटकाच्या सादरीकरणाची चुणूक शिबिरार्थींना मिळावी म्हणून बसवायला सुरूवात केली गेली. म्हणजे हा जो कालचा समारंभ होता, तो या सादरीकरणांच्या कालावधीपर्यंत त्यांच्या शिक्षणाचाच भाग होता हे आता इथे सांगायला हरकत नाही. प्रशिक्षणासाठी एखाद्या नाट्य-प्रशिक्षण संस्थेमधे अथवा विद्यापीठात जे केलं जातं ते सर्व इथे, पीडीएमधे केलं जातंच पण त्यात पीडीएने गेल्या अनेक वर्षांमधे कमावलेल्या उत्तम व्यवस्थापन कौशल्यांचा आणि ते साकारणार्या आमच्या सगळ्या सदस्यांचाही कस इथे लागत असतो. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य, प्रकाश (आणि संगीतही) हे सर्व वेळच्यावेळी, म्हणजे एकतर तालमींच्या एकंदर पांच दिवसांपैकी जवळपास शेवटच्या एक-दोन दिवसातच जागच्याजागी उपलब्ध करून देणं ही एक कमालच असते. प्रेक्षकांचा फार वेळ न खाता काही क्षणात पुढल्या प्रवेशासाठी सर्व सिद्धता सुदर्शनमधे करून दिली जात असते. यातूनच पीडीएची अफलातून बॅकस्टेज टीम तयार होत गेली आहे. स्मिता तावरे, अमृता वाणी, प्राजक्ता पाटील, प्रवीण निडगुंडे, रूपाली भावे, विक्रांत ठकार ही सर्व मंडळी ही सर्व जय्यत तयारी करण्यात आणि शिबिरार्थींना तयार करण्यात गुंतली होती .. दुपारी तीन वाजल्यापासून अगदी थेट समारंभ संपल्यावरही त्यांचं काम चालूच होतं.
काल पहिला प्रवेश सादर झाला तो आचार्य अत्रे यांच्या भ्रमाचा भोपळा या नाटकावर आधारित होता. अत्र्यांची भाषा आणि त्यातला गडगडाटी विनोद एक शिबिर केल्यावर शेवटच्या पाच दिवसांच्या तालमींच्या भांडवलावर पेलणं हे महा-आव्हान या संघाने चांगलंच पेललं. तरूण पिढीतल्या प्रेक्षकांनी काही विनोद तर अक्षरशः डोक्यावर घेतले. निखिल देव आणि सागर यार्दी या दोघांनी या प्रवेशाचं दिग्दर्शन केलं होतं
भ्रमाचा भोपळा १
भ्रमाचा भोपळा २
भ्रमाचा भोपळा ३
भ्रमाचा भोपळा ४
भ्रमाचा भोपळा ५
भ्रमाचा भोपळा ६
भ्रमाचा भोपळा ७
दुसरा प्रवेश सादर केला गेला तो होता “एक लिअर असा !” ह्या मधे विंदा करंदीकर यांनी शेक्सपिअरच्या किंग लिअरचं जे मराठी भाषांतर केलं आहे, त्यातील काही स्वगतांसहित एका ज्येष्ठ नाट्यकलावंताच्या भ्रमिष्ठपणासोबत, त्याच्या मुलीने त्याचा घेतलेला शोध असं कथानक होतं. प्रदीप वैद्य यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या प्रवेशात अभिनयावर कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि अगदी छोट्यातछोटे बारकावेही न सोडता केलेला नैसर्गिक अभिनय ही वैशिष्ठ्ये होती.
एक लिअर… १
एक लिअर… २
एक लिअर… ३
एक लिअर… ४
एक लिअर… ५
एक लिअर… ६
एक लिअर… ७
अनिल बर्वे हे व्यावसायिक रंगभूमीला अतिशय वेगळ्या धाटणीची समर्थ नाटकं देणार्या लेखकाचं नाव. अलिकडे त्यांचं हमीदाबाईची कोठी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलं आहे. त्याचं आणखी एक नाटक “ मी स्वामी या देहाचा ..” चक्क इच्छामरण या विषयावर होतं आणि ते जवळपास वीस वर्षांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर सादर होत होतं. या नाटकातल्या प्रवेशावर आधारित तिसरं सादरीकरण संहितेची उत्तम बांधीव रचना आणि त्यामधे मांडलेले या विषयाशी संबंधित विविध प्रश्न लोकांसमोर संयत पण प्रभावीपणे सादर करणार्या या नवीन कलाकारांमुळे चांगलंच वठलं ! दिग्दर्शक अशिष वझे.
मी स्वामी … १
मी स्वामी …२

मी स्वामी … ३
मी स्वामी … ४
मी स्वामी … ५
मी स्वामी … ६
मी स्वामी … ७
यावर्षीच्या प्रवेशनिवडीचं वैशिष्ठ्य असं की सर्व विविध प्रकारचे प्रवेश यावर्षी होते. जुनं, विनोदी, भाषेचं सौंदर्य जपणारं, लयबद्ध संवाद असलेलं, थोडं भास-आभासांचं नाट्य, काहीसं जुन्या पण ठाशीव रचनेचं, उत्तम संवादात्मक रचनेचं या सर्वांसोबतच अगदी आजचं, प्रायोगिक रंगभूमीवरचं आजच्या जीवनाचा शोध घेणारं असही त्यात होतं .. सागर देशमुख ह्या पीडीएच्या शिबिरातच आपली नाट्यवाटचाल सुरू केलेल्या तरूण लेखकाचं तळ्यात मळ्यात हे नाटक रुपाली भावेने दिग्दर्शित केलं होतं .. ही एकांकिका पस्तीस मिनिटं दोनच कलाकारांमधे सादर होते .. हे एव्हढंच नाही तर त्यातले सर्व बारकावे टिपत, ते सादर करत पुढे जात आजच्या तरूण जोडप्याचं तुटलेपण सादर करण्याचं आव्हान दोन्ही कलाकारांनी मस्त पेललं.
तळ्यात मळ्यात १
तळ्यात मळ्यात २
तळ्यात मळ्यात ३
तळ्यात मळ्यात ४
तळ्यात मळ्यात ५
तळ्यात मळ्यात ६
तळ्यात मळ्यात ७
मग रेणुका बोधनकरने शिबिरार्थींच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त केलं. उत्तम वही (शिबिर दैनंदिनी) लिहिण्याचं प्रोत्साहनपर बक्षिस मिळालं ते जान्हवी काळे, वृशाली कुरणे, अधीश पायगुडे आणि आशिष जाधव यांना. खूप मन लावून आणि अतिशय सविस्तरपणे आणि नीट ही रोजनिशी लिहिल्याबद्दल. या समारंभाच्या अध्यक्षा म्हणून आलेल्या डॉ. माधवी वैद्य (कवयित्री, लेखिका आणि कार्याध्यक्षा, मराठी साहित्य परिषद, पुणे) यांनी मग सर्व शिबिरार्थींचं कौतुक केलं आणि कुसुमाग्रजांच्या कविता आणि अन्य दाखले देत खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि हा सोहळा संपला.
अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य
आज संध्याकाळी जवळपास सर्व शिबिरार्थींचे एकमेकांना आणि प्रशिक्षकांना एसेमेस् गेले असतील. काही शिबिरार्थींनी तर चक्क ५ वाजता व्यायाम केला, वाचन, गप्पा अश्या गोष्टी एकमेकांच्या सोबतीत आजही केल्या आणि मग ९.३० ला श्लोक म्हटला आणि घरी गेले. शिबिराचं हे असंच आहे .. असतं .. ते दिवस संपतात .. पण त्यांची जादू चालूच राहाते .. पुढे अनेक दिवस .. कदाचित जन्मभर !




























janhavi deshpande म्हणाले,
जून 7, 2011 at 5:48 pm
kay lihu.evdha chan lihilyavar maze shabh tyapudhe kahich nai.pan manatla lihila .shibir samplyavarchya saglyancha dolyat pani nakki hota .kadhi changla zala mhanun anandache ashru tar nantar sagale janar mhanun bichadnyache ashru.but hoping to see all together again for the same thing…..drama.Tumhi sagle directors ni amhala aaplya swatahachi mula aslya sarkha treat kela we r all thankful to them and will never ever forget them.ani sagle karyakartyanni tar amchya peksha amchyavar jast mehanat ghetli.thanks to them.dada tumhi mala visraycha tharavala tari me tumhala visru denar nai.asech tumchi ani PDA chi pragati hou de evdhich devakade prarthana.
निरंजन गोखले म्हणाले,
जून 7, 2011 at 6:29 pm
गेली २ वर्ष (२००९ आणि २०१०) मी हा समारोप समारंभ बघतोय. आणि गेली ३ वर्ष मी या शिबिरामध्ये लुडबुड [:)] करतोय! त्यामुळे या वर्षी काहीही न केल्याची खूपच खंत आहे…
म्हणून ही छायाचित्रं बघून मला जरा खूपच बरं वाटलं पण त्याच बरोबर जरा जास्तच “त्रास” झाला (मी तिथे का नव्हतो असं पुन्हा-पुन्हा वाटत राहिलं)
Darshan Patankar म्हणाले,
जून 9, 2011 at 4:39 pm
He shibir ek avismaraniya anubhav aahe . Atishay systematic paddhatine ha course design kelela ahe. Vicharanchi disha ,tyachi paddhat ya shibiramule nakkich badalte. Kewal natakat nahi tar ayushyatsuddha ya shibirat shiklelya anek goshtincha upayog hotoy. Pratyekane karawa asa he shibir ahe.
amogh kulkarni म्हणाले,
जून 9, 2011 at 6:51 pm
या वेळी प्रेक्षकात बसून हा समारोप सोहळा बघायला मिळाला याचे खूप समाधान वाटले! मागच्या वर्षी आम्ही रंगमंचावर होतो, तो दिवस अक्षरशः डोळ्यांसमोर आला. ५ दिवसात जवळजवळ नवख्या लोकांकडून इतके सुंदर प्रवेश बसवून घेता येतात याची अनुभूती मागच्या वर्षी आली होतीच पण तो अनुभव यावेळी प्रेक्षक म्हणून घायला मिळाला! नाटकाचा विद्यार्थी म्हणून असे प्रवेश बघताना खूप नव्या गोष्टी कळल्या आणि काही जुन्या शिकवणींची उजळणी झाली. एकूणच खूप मजा आली! शकू काकांनी सांगितलेले ” ही तुमची पहिली पायरी आहे, इथून तुमची सुरुवात होते ” परत एकदा मनावर बिंबले. वर्षातून शिबीर एकदाच का असते अशी खंतही वाटली. असो, आता पुढच्या वर्षी ………………… क्रमशः !